मानसिक अपंगत्व म्हणजे काय? – Prabodhini Trust Nashik

मानसिक अपंगत्व म्हणजे काय?

बुद्धीची वाढ खुंटली किवा मंदावली असेल, बौद्धिक क्षमता कमी असल्यामुळे सद्यपरीस्थितीशी जूळवून घेण्याची क्षमता नसणं म्हणजेच मानसिक अपंगत्व होय. सर्वसाधारणपणे बुध्यांकानुसार मानसिक अपंगत्वाचे चार स्तर पडतात. ज्याचा बुध्यांक ७० पेक्षा कमी असता त्यांनाच मानसिक अपंग म्हणता येते. सुरवातीला ह्या मुलांना मतिमंद, नंतर मानसिक अपंग आणि आता त्यांच्यासाठी दिव्यांग हा शब्द वापरला जातो. यांना विशेष मुले असेही संबोधले जाते. विशेष गरजा असलेल्या विशेष शिक्षकांतर्फे विशेष गरजा असलेली विशेष मुले. ह्या मुलांना विशेष शिक्षकांतर्फे विशेष शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्याना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

मानसिक अपंगत्वाचे ४ स्तर आहेत.

  • 1. ५० ते ७० – सौम्य मानसिक अपंगत्व
  • 2. ३५ ते ४९ – मध्यम मानसिक अपंगत्व
  • 3. २० ते ३४ – तीव्र मानसिक अपंगत्व
  • 4. २० च्या खाली – अतितीव्र मानसिक अपंगत्व

 

वयाने कितीही मोठे झाले तरी मानसिक वय हे ३ ते ९ वर्षेच राहते.

  • अतितीव्र मानसिक अपंगत्व – हे मुल सर्व बाबतीत संपूर्णपणे परावलंबी असते. शाळेपर्यंत पोहचू शकत नाही.
  • तीव्र मानसिक अपंगत्व – स्वत:च्या वैयक्तिक गरजाही भागवता येत नाहीत. व्यवहार ज्ञान नसते. शालेय शिक्षणाची क्षमता नसते. काही प्रमाणात शारीरिक दोष आढळतात. वृत्ती चंचल आणि अस्थिर असते.
  • मध्यम मानसिक अपंगत्व – ही मुले ब-यापैकी आपल्या वैयक्तिक गरजा भागवू शकतात. या मुलांची अवधान क्षमता रुची, स्मृती, समज सामान्य मुलांपेक्षा की असते. ही मुले शालेय शिक्षण घेऊ शकत नाही. थोडीफार अक्षर ओळख आणि थोडेफार संख्या ज्ञान येथेच यांची शैक्षणिक प्रगती थांबते.
  • सौम्य मानसिक अपंगत्व – आपल्या वैयक्तिक गरजा पूर्णपणे भागवू शकतात. लेखन, वाचन थोड्याप्रमाणात करू शकतात. चित्रकला, हस्तकला, नृत्य, खेळ इत्यादी कौशल्ये करू शकतात विशेष शाळांमधून साधी सोपी व्यावसायिक कौशल्येही मुले शिकू शकतात. पुनरावृतीची कामे ही मुले चांगली करतात. काही प्रमाणात आर्थिक पुनर्वसन होऊ शकते. परंतु त्यासाठी अथक प्रयत्नांची गरज असते. शाळा, शिक्षक आणि पालक ह्यांच्याबरोबरच समाजाचा पण सहभाग असणे फार गरजेचे आहे.

पालक ज्यावेळी ह्या मुलांना घेऊन शाळेत येतात तेव्हा ते अतिशय दु:खी निराश व भांबाबलेले असतात. आपल्याच नशिबी असे बाळ का? आपण काय पाप केले, असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात असतात. आपले बाळ हे सर्वसामान्य बाळापेक्षा वेगळे आहे. हे मानायला त्यांचे मन तयारच होत नाही. अशा वेळी त्यांना योग्य मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते. डॉकटरांनीही अशा बाळाचे त्वरित निदान करून पालकांना त्याबाबतीत योग्य ती माहिती द्यायला हवी.

सगळ्यात आधी आपले बाळ सर्वसामान्य नाही हे पालकांनी स्वीकारले पाहिजे. फक्त आई वडिलांनीच नाही तर संपूर्ण कुटुंबाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. समस्या लक्षात आल्याबरोबर पालकांनी जर तज्ञाचे मार्गदर्शन घेतले तर त्वरित उपचार करून समस्या कमी होण्यास मदत होते. हा आजार नाही तर ती एक स्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आजार औषधाने बरा करता येतो तर मानसिक अपंगत्वासाठी कुठेही उपाय किवा औषध नाही. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण हा एकाच मार्ग आहे. हे मुल कधीही पूर्णपणे सुधारू शकत नाही. यांना जन्मभर कुणाच्या तरी मदतीची आवश्यकता असते. आधाराची गरज असते. ही मुले फार निरागस असतात. त्यांना दयेची नाही तर प्रेमाची गरज असते. ह्या मुलांसाठी अनेक तज्ञांचा गट काम करीत असतो केंद्रबिंदू बालक असतो व इतर सर्व तज्ञ त्यासाठी काम करीत असतात.